Monday, 7 May 2012

प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी क्वेस्ट!

राममोहन खानापूरकर, संशोधक, प्राथमिक शिक्षण, ऑब्झव्‍‌र्हर रिसर्च फाऊंडेशन, मुंबई.
काही वर्षांपूर्वी चौथीपर्यंत पोचूनसुद्धा अमेरिकेतील मागास वर्गातील मुले दुसरीची पुस्तके वाचू शकत नाहीत, असे एका राष्ट्रीय अहवालाने सिद्ध केले होते. या अहवालामुळे अमेरिकन समाजजीवनात मोठय़ा प्रमाणावर बौद्धिक घुसळण झाली. या शैक्षणिक समस्येकडे डोळसपणे पाहणाऱ्या विद्यापीठांपासून ते शिक्षणतज्ज्ञांनी कंबर कसली आणि ‘लहान मुलांसाठी वाचन ओळख’ हा आपल्या चिंतनाचा विषय बनवला. एक राष्ट्रीय आपत्ती म्हणूनच सर्व समाजाने त्याकडे पाहिले व त्यासाठी नवीन ज्ञानविश्वाची रचना केली. The National Early Literacy Panel (NELP) सारखे उपक्रम हातात घेऊन अमेरिकन सरकारने ‘आरंभिक वाचन ओळख’ या विषयासाठी राष्ट्रीय धोरण आखले. तेथील शिक्षक संघटनांनी पुढाकार घेऊन Teaching Reading is a Rocket Science या अभिनव प्रशिक्षण पुस्तकाची निर्मिती केली. हा सर्व विषय ‘आरंभिक साक्षरता’ (Early Literacy) या विषयांतर्गत येतो. पाश्चिमात्य देशांमध्ये यावर विद्यापीठे व भाषातज्ज्ञ जीव ओतून काम करतात. हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे आपल्याकडेही अनेक वर्षे चौथीपर्यंत पोचूनसुद्धा मुले लिहिती-वाचती होत नाहीत. याबद्दल प्रसारमाध्यमे, मोठय़ा संस्था ओरड करताना दिसतात. मात्र संशोधक वृत्तीने उपाययोजना करण्यापेक्षा आगपाखड करण्यावर आपला अधिक भर असतो. जागतिक स्तरावर प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये ‘आरंभिक वाचन व लेखन ओळख’ हा विषय महत्त्वाचा मानला जातो. त्याकडे गांभीर्याने पाहून उपाय शोधण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील ‘क्वेस्ट’ ही शैक्षणिक संस्था (QUEST- क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) गेली काही वर्षे करत आहे. या संस्थेतर्फे अलीकडेच वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेसंदर्भातील संस्थेच्या कामाचे प्रदर्शन भरवले गेले होते. त्यानिमित्ताने या संस्थेच्या मूलभूत कामाची ओळख करून द्यावीशी वाटते.
ठाणे जिल्ह्य़ातील वाडा तालुका व नंदुरबार जिल्ह्य़ात संस्थेचे पूर्णवेळ प्रकल्प सुरू आहेत. राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळांना या संस्थेकडून सहकार्य दिले जाते.
प्राथमिक शिक्षणासंदर्भातील पहिली व महत्त्वाची समस्या म्हणजे या शाळांतील शिक्षकांच्या सक्षमीकरणाची. कालबाह्य़ झालेल्या डी.एड. अभ्यासक्रमाची शैक्षणिक पुर्नरचना करण्याची प्राधान्याने गरज आहे. ‘क्वेस्ट’च्या पुढाकाराने स्थापन झालेला ‘शिक्षकांचा अभ्यास गट’ महिन्यातून एकदा वाडा तालुक्याच्या सोनाळे गावातील कार्यालयात भरतो. पंचक्रोशीतले शिक्षक त्या गटात येऊन चर्चा, वाद-विवाद व मतप्रदर्शन करतात. शिक्षणविषयक विविध बाबी प्रकटपणे मांडण्यासाठीची अभिव्यक्ती त्यांना हा गट देतो. शिक्षणातील परिवर्तन, नवशिक्षणातील घडामोडी, शैक्षणिक धोरणे अशा विषयांवर मनमोकळी चर्चा या गटात होते. कालांतराने अनेक शिक्षकांना या गटात सामील करून घेण्याची गरज या संस्थेला वाटू लागली. जे वाडय़ातील शिक्षकांना मिळते ते नंदुरबारमधील शिक्षकांनादेखील मिळावे, ही भावना त्यामागे होती. त्यासाठीच इंटरनेटचा वापर करून मराठीतून ऑनलाइन अभ्यासक्रम राबवायची व इंटरनेटद्वारा व्यासपीठ तयार करण्याची अभिनव संकल्पना या संस्थेने अमलात आणली.
वर्गातील अध्ययन-अध्यापनाची चौकट अधिक संदर्भपूर्ण, कल्पक व पद्धतशीर व्हावी यासाठी ऑनलाइन व्यवस्थेचा पूरक-व्यवस्था म्हणून प्रभावी वापर करता येतो. मोठमोठय़ा शैक्षणिक संस्थांमध्ये अशाप्रकारे ऑनलाइन कोर्सेस राबवण्याची कार्यसंस्कृती रुजली आहे. अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन व्यवस्थापनासाठी मुडल (MOODLE) ही इंटरनेट-आधारित अध्ययन प्रणाली लोकप्रिय आहे. ही प्रणाली मुक्त स्वरूपातील (Open Source) असल्याने ती विनामूल्य उपलब्ध आहे. मात्र आजच्या घडीला मुडलचा वापर हा इंग्रजी केंद्री आहे. त्याचा मराठीतून वापर करण्याचा अनोखा प्रकल्प ‘क्वेस्ट’मार्फत महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवला गेला आहे. नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा तालुक्याच्या लोणखेडा गावातील साने गुरुजी शिक्षण मंडळाच्या डी.एड्. महाविद्यालयाने यासाठी पुढाकार घेतला. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मुडलद्वारे ऑनलाइन शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचा पहिला टप्पा ‘क्वेस्ट’ने यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. दुर्गम ग्रामीण भागांत प्रादेशिक भाषेतून तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी  उचलण्यात आलेले हे पाऊल प्रशंसनीय आहे. मुडलने उपलब्ध करून दिलेल्या सोयी वापरण्याआधी त्याचा तांत्रिक तपशील समजावून घेणे, प्रशिक्षणार्थीपर्यंत त्याची उपयोजिता पोचवण्याचे काम संस्थेने केले. या व अशा विविध प्रकल्पांसाठी सर रतन टाटा ट्रस्टचे पाठबळ संस्थेला लाभले आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विविध भागांत विखुरलेल्या शिक्षकांना एकत्रित करण्यासाठी ‘ऑनलाइन व्यासपीठ’ या संस्थेने तयार केले आहे. या व्यासपीठामार्फत आज अनेक शिक्षक शैक्षणिक बाबींवर खुलेपणाने चर्चा करत आहेत. या व्यासपीठाच्या प्रभावी वापरासाठी सहभागींना मराठीतून टंकलेखनाचे रीतसर प्रशिक्षणदेखील देण्यात आले. हे व्यासपीठ म्हणजे कुठलेही प्रोत्साहन नसलेल्या ग्रामीण भागातील शिक्षकांचे एकप्रकारचे फेसबुकच आहे. नवशैक्षणिक विचारांतून संशोधनमान्य झालेल्या विविध अध्यापन पद्धती या व्यासपीठाद्वारा शिक्षकापर्यंत सातत्याने पोचवण्यात येतात. ‘मुडल’ आणि ‘ऑनलाइन व्यासपीठ’ ही शैक्षणिक परिवर्तनाची आधुनिक साधने आहेत. मात्र त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निव्वळ तंत्रज्ञान पुरेसे नाही. कळीचा प्रश्न आहे तो प्रादेशिक भाषांमधील दर्जेदार वैचारिक मजकुराचा. सध्याच्या साचेबंद शैक्षणिक वाचन-साहित्याला मोकळे करण्यासाठी वैविध्यपूर्ण मजकूर तयार करण्याचे कामही ‘क्वेस्ट’ने एकीकडे सुरू केले आहे. माहिती तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागांतील शिक्षकांच्या गुणवत्तावृद्धीचा हा अभिनव प्रकल्प शिक्षण खात्याने समजावून घेऊन त्याच्या सार्वत्रिकीकरणासाठी धोरण आखण्याची गरज आहे.
ग्रामीण व आदिवासी भागांतील मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न लक्षात घेऊन उभारलेला ‘आरंभिक अक्षर व वाचन ओळख’ हा संस्थेच्या कामाचा गाभा आहे. किंबहुना या प्रश्नावर एवढय़ा सखोलपणे काम करणारी क्वचितच एखादी संस्था असेल. मुळात प्राथमिक स्तरावर भाषाशिक्षणाच्या (अक्षर व वाचन ओळख) आपण वर्षांनुवर्षे प्रमाण मानलेल्या अध्यापन-पद्धतींमध्ये मूलभूत दोष आहेत. डॉ. मॅक्झिन बर्नस्टनसारख्या अमेरिकन विदूषीने आपल्या संशोधकीय लिखाणातून पाठय़पुस्तकातील मराठीच्या अध्यापन पद्धतीतील दोष सप्रमाण दाखवून दिले आहेत. आपल्याकडेही NCERT सारख्या संस्थांनी यावर काम करून प्रारंभिक स्तरावरील योग्य भाषाशिक्षण पद्धतींची काही मानके व प्रारूपे तयार केलेली आहेत. मात्र त्याच्या सार्वत्रिकीकरणाच्या अभावामुळे आपल्याकडे पहिली-दुसरीच्या स्तरावर मुलांची भाषाओळख (विशेषत: वाचन ओळख) सदोष पद्धतीने होते. त्याचा कायमस्वरूपी त्रास त्यांना पुढील इयत्तेत होतो व मुलांची शैक्षणिक वाढच खुंटते. यासाठी प्रकल्पांच्या गावांमध्ये ‘क्वेस्ट’ शाळेच्या वेळानंतर बालभवने चालवते. गावांतील तरुणांना प्रशिक्षित करून त्यांच्याद्वारे आरंभिक वाचन-लेखनाचे वर्ग चालवले जातात. ‘क्वेस्ट’च्या संशोधकीय कार्यपद्धतींना अनुसरून कोणताही उपक्रम राबवण्याआधी ‘क्वेस्ट’चे प्रशिक्षक शाळेतील विद्यार्थ्यांचे सखोल सर्वेक्षण करतात. त्यामुळे मुलांच्या सद्य:स्थितीचा नेमका अंदाज बांधता येतो व त्यानुसार कार्यक्रमाची पातळी ठरवली जाते. हा कार्यक्रम पहिली ते चौथीच्या स्तरावर राबवण्यासाठी ‘क्वेस्ट’ने ‘माझे पुस्तक’ या पूरक कार्य-पुस्तिकांच्या मालिकेची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील सांस्कृतिक पाश्र्वभूमी लक्षात घेऊनच या पुस्तिकांची निर्मिती केली गेली आहे.
रोजच्या कामाचे प्रलेखन व त्याचे संशोधकीय मूल्यमापन हे ‘क्वेस्ट’च्या कामाचे आणखी एक वैशिष्टय़. वाचन-ओळख अध्यापनाची गुणवत्ता सुधारून मुलांमध्ये त्याची जोपासना करणे ही सातत्यपूर्ण व दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठीच्या संशोधन कार्यक्रमाला 'Longitudinal Study' असे शिक्षणक्षेत्रात संबोधले जाते. अशा प्रकारच्या अभ्यासानेच खरेखुरे ‘रिझल्ट’ मिळत असतात व कामाला दिशा लाभते. प्राथमिक शिक्षणाला अशी दिशा दाखविण्यासाठीच ‘क्वेस्ट’ने लांबपल्ल्याचा पण दूरगामी परिणाम घडवून आणणारा मार्ग निवडला आहे. बहुतांश ग्रामीण भागांमध्ये मुलांच्या घरात बोलली जाणारी भाषा व शाळेच्या पाठय़पुस्तकांतील भाषा यात काहीसा फरक असतो. ही दरी बुजवण्यासाठी काही विशिष्ट अध्यापन-पद्धती ‘क्वेस्ट’ राबवते. भाषा शिक्षणातील अशा विशिष्ट पैलूंवर आपल्याकडे एवढा विस्तारपूर्वक व नेमकेपणाने अभ्यासच झालेला नाही.
शिक्षकांच्या सातत्यपूर्ण विकासासाठी ‘क्वेस्ट’ राबवत असलेल्या उपक्रमांची व्याप्ती आता वाढली आहे. गणित व भूगोल अध्यापनांतील विविध संकल्पनांवर शिक्षकांसोबत येथे वैशिष्टय़पूर्ण काम केले जाते. त्यासाठी ‘क्वेस्ट’ शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करते. जाता-जाता एका महत्त्वाच्या प्रकल्पाचा उल्लेख करणे अपरिहार्य आहे. वाडा तालुक्यामधील जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी परिसर-शिक्षणाचा भाग म्हणून गावातील ऊर्जा व शेतीच्या मूलभूत समस्यांचा अभ्यास करून त्यावर शास्त्रीय उपाय सुचवले आहेत. त्या अभ्यासावर आधारित विज्ञान प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी’ गेली तीन वर्षे निवडले जात आहेत. दुर्गम ग्रामीण भागांतील साधनविरहित विद्यार्थ्यांची ही बौद्धिक भरारी कौतुकास पात्र आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना व प्रकल्पासाठी नेमलेल्या शिक्षकांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन करून ‘क्वेस्ट’च्या टीमने बहुमोल सहकार्य केले आहे                    by- loksatta

Thursday, 5 April 2012

प्राचीन विचारधन आणि आधुनिक मानव

     भारतामध्ये गेल्या पाच हजार वर्षात ज्या मूल्यांचा पुरस्कार करण्यात आला त्यांचे अनुसरण आणि आचरण आजच्या काळातही तेवढेचावश्यक आहे. परंतु, आपल्या या अमोल वारशाची फारच थोड्या भारतीयांना जाणीव दिसते.
     सोन्याचे पोते आपल्या पाठीवरून वाहणार्‍या गाढवासारखी भारताची अवस्था आहे, अशी माझी खात्रीच झाली आहे. आपण काय वाहून नेत आहोत, हे त्या गाढवाला माहित नसते. आपण ओझे वाहून नेत आहोत, एवढ्यावरच ते खूश असते. हा सुवर्णभार म्हणजे अजब खजिना आहे- कला, वाड्.मय संस्कृती आणि आयुर्वेदासारखी काही शास्त्रे यांचा वारसा आपल्याला प्राचीन काळापासून लाभलेला आहे. 'ऋषिमुनींनी शोधून काढलेला आध्यात्मिक सत्याचा भव्य कोश' असे आदि शंकराचार्यांनी याचे वर्णन केले आहे. सगळ्या जगाचा मार्गदर्शक होण्याची भारतामध्ये क्षमता आहे, असे रवींद्रनाथ टागोर म्हणत.
     प्राचीन भारताची ही सोनेरी देणगी असंख्य ऋषींच्या आणि संतांच्याद्वारा अखंदितपणे आपल्यापर्यंत येऊन पोहचली आहे. यांपैकी काही संतांना जागतिक लौकिक प्राप्त झाला, तर काही अनामच राहिले. आपली संस्कृती प्राधान्याने आध्यात्मिक विकासाशी संबंधित असल्यामुळे आजच्या युगात विशेषच महत्त्वाची ठरते.  कारण, भौतिकवादी प्रगतीचे निर्थकत्व सगळ्यांनाच कळून आले आहे. श्री. अरविंद म्हणत, 'प्राचीन भारत अजूनही जिवंत आहे, अजून त्याने आपला अखेरचा सर्जनशील शब्द उच्चारलेला नाही. प्राचीन भारताचे अस्तित्व अजून टिकून असून स्वतःच्या आणि सार्‍या मानव जातीच्या कल्याणासाठी त्याला बरेच काही करायचे आहे.'
     भारत शाश्वत आहे, चिरकालीन आहे. येथील प्रारंभकाळामधील अनेक संस्कृती इतिहासाच्या धूसर प्रकाशात विरून गेलेल्या असल्या तरी या भूमीला चिरतारुण्याचे वरदान लाभलेले आहे. भारतातील संस्कृती कालातीत असून, ख्रिस्त जन्माच्या वीस शतके अगोदर तिला जेवढे महत्त्व होते तेवढेच ते आपल्या या विसाव्या शतकातही टिकून राहिलेले आहे. संपूर्ण मानववंशाचा अभ्यास केल्यानंतर डॉ. अरनॉल्ड टायनबी म्हणतात," मानव जातीला आत्मविनाश करून घ्यायचा नसेल तर पाश्चिमात्य प्रारंभ असलेल्या प्रकरणाचा भारतीय समारोप होणे आवश्यक आहे, हे आता सगळ्यांनाच कळून आले आहे. मानवजातीच्या इतिहासातील अत्यंत धोकादायक क्षण सध्या अवतरला असून मानवजातीने भारतीय मार्गाचा अवलंब केला तरच तिची सांप्रतच्या गंभीर संकटातून सुटका हो ऊ शकेल. सम्राट अशोक आणि महात्मा गांधी यांनी पुरस्कारलेली अहिंसा आणि श्रीरामकृष्ण परमहंस यांनी प्रतिपादन केलेला सर्वधर्मसमभाव हाच तो भारतीय मार्ग होय. मानवजातीने तो अनुसरला तर एका कुटुंबाचे घटक म्हणून तिची वाटचाल हो ऊ शकेल. सध्याच्या अणुयुगात आपल्याला आपला नाश करून घ्यायचा असेल तर भारतीय मार्गाशिवाय पर्यायच नाही."
      तायनबी यांच्या या विवेचनात भारताच्या प्राचीन ऋषींनी पुरस्कारिलेल्या वसुधैव कुटूंबकम या आदर्शाचाच पडसाद उमटला आहे. संपूर्ण विश्व चैतन्यमय असून हे चैतन्य सर्वोच्च आणि अपरिवर्तनीय आहे आणि भौतिक जग हा त्या चैतन्याचा केवळ आविष्कार आहे, हेच सर्व मूलभूत सूत्रांमधील अत्यंत मूलभूत सूत्र आहे. भारताला हजारो वर्षापूर्वीच या सूत्राचा साक्षात्कार झाला आनि त्याचे अपरिमित महत्त्वही कळून आले. आजचे अत्यंत प्रगत देश अजूनही त्या बाबतीत अंधारातच गुढ भौतिक परिभाषेने कधीच उकलणार नाही. आजचे अवाढव्य ज्ञान ऋषींच्या बुद्धिपलिकडे जाऊच शकत नाही, तसेच अत्यंत प्रगत अवस्थेतील विज्ञान वेदांताच्याच अधिक जवळ गेले आहे.
     उच्च मोल्यांचा आग्रह धरल्यामुळे प्राचीन भारताला महानता प्राप्त झाली. त्या मूल्यांपेक्षा अधिक उदात्त मूल्ये शोधून काढणे अशक्य आहे. आपल्या प्राचीन मुनींनी कोणत्याही देशाचा मोठेपणा त्याच्या साम्राज्यावरून किंवा त्याच्या संपत्तीवरून मोजला नाही. सार्वजनिक प्रशासनामध्ये आणि नागरिकांच्या वैयक्तिक जीवनामध्ये कर्तव्य आणि करुणा यांचा किती आढल होतो, या निकषावरच ते मोठेपणा ठरवित असत. माणसाची खरी प्रगती त्याच्या नैतिक आणि आध्यात्मिक विकासावर अवलंबून असते, भौतिक वा ऐहिक दर्जावरून ती ठरत नाही, हाच आपल्या ऋषिमुनींना सनातन संदेश होता. यशापेक्षा त्यागाला अधिक मान दिला जात असे. लोभ आणि मोह यांच्यापासून मुक्त होण्यात माणसाचे सर्वोच्च कर्तृत्व सामावलेले आहे, अशी त्यांची धारना होती. संपत्ती किंवा सत्ता यावरून नागरिकाचे समाजातील स्थान ठरत नसे. व्यासंग, दानत आणि निष्ठा हे नागरिकांच्या प्रतवारीचे निकष असत. भगवान बुद्धांचा सच्चा अनुयायी असलेला सम्राट अशोक हे या उदात्त प्रथेचे उत्कृष्ट उदाहरण होय. अशोक सम्राट असूनही बौद्ध भिक्षूंचे दर्शन होताच त्यांना लवून वंदन करीत असे. या एवढ्या मोठ्या सम्राटाने भिक्षूंसमोर नतमस्तक होणे चुकीचे आणि अनुचित आहे, असे त्याचा मंत्री यश याचे मत होते. अशोकने त्याला उत्तर दिले," या भिक्षूंना प्रणाम करून व्यासंग , ज्ञान आणि त्याग या गुणांसंबंधीचा माझा परमादर मी व्यक्त करीत असतो. यश, माणसाचा दर्जा वा स्थान यांच्यापेक्षा त्याचे सदगुण आणि ज्ञान यांनाच जीवनात महत्त्व असते. कुरुप दिसणार्‍या शरीरातही उदात्त मन आणि अंतःकरण वसू शकते. तू जेव्हा तुझे अज्ञान दूर करशील तेव्हाच तुला मानवजातीच्या महासागरामध्ये फारच थोडे महात्मे आहेत, हे कळून येईल. कवडी किंमतीच्या गारगोट्यांमध्ये एखादे जरी रत्न आढळले तरी खरा रत्न पारखी ते लगेच ओळखू शकतो."
     धर्म या संस्कृत शब्दाचा इंग्रजीमध्ये उचित अनुवाद करता येत नाही. सदवर्तन, कर्तव्य, मूलभूत नियम, नैतिकता अशा संकल्पनाम्चा धर्म या शब्दामध्ये अंतर्भाव होतो.
     धार्मिक स्वातंत्र्याची आणि सहिष्णुतेची परंपरा भारतात कधीही खंडित झालेली नाही. सत्य हे कोणत्याही पंथाची वा संप्रदायाची मिरासदारी हो ऊ शकत नाही, या जाणिवेतूनच त्या परंपरेचा उदय झाला. 'प्रत्येक दिशेकडून आमच्याकडे श्रेष्ठ विचार येवोत,' ही ऋग्वेदातील प्रार्थना जगप्रसिद्ध आहे.
      प्रत्येक माणसाला स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात आणि आत्म्याची अंतिम विकासावस्था गाठण्यासाठी स्वतःच आध्यात्मिक अनुभव घ्यावा लागतो, हे सत्य आपल्या ऋषिमुनींना उमगले होते. कोणत्याही व्यक्तीचा वा ग्रंथाचा अधिकार स्वतः विचार न करता मान्य केला की आध्यात्मिक अर्धांगवायूचा प्रादुर्भाव झालाच म्हणून समजा. श्रुती जे काही सांगत आहेत ते मुकाट्याने मान्य करणे पुरेसे ठरत नाही. ही अभिवृद्धी कशी साध्य करावी यासाठी ठराविक नियम नसतात. ज्याचा त्यानेच हा अनुभव घ्यावा लागतो. मोक्षप्राप्तीचा मार्ग अत्यंत अरुंद असून त्याच्या दोन्ही बाजूंना खोल विवरे असतात. तीक्ष्ण, धारदार पात्यावरून वाटचाल करण्याइअतके ते महाकठीण असते, असे कठोपनिषदात म्हटले आहे.
ध्यानधारणेतून दैवी शक्तीचा साक्षात्कार घडतो. त्यासाठी चिरंतनाच्या शिखरावर आपल्या आंतरिक चैतन्याने शांत विहार करणे आवश्यक असते. ध्यानधारणेइतकेच कर्मही महत्त्वाचे ठरते. प्रार्थना किंवा कर्म किंवा ज्ञान हे मुक्तीचे मार्ग होत. अविरत कर्म आणि अखंडित विश्रांती यांचा गूढ समन्वय म्हणजे श्रीअरविंदसारख्या महायोग्यांचे जीवन, भगवद्गीतेने म्हटले आहे: " जो कर्मात विश्रांती आणि विश्रांतीत कर्म अनुभवतो तोच खरा ज्ञानी होय, त्यालाच योगी म्हणावे."
      सत्याचा शोध करणार्‍या सर्वांनाच वेदांत मार्गदर्शक ठरतो, असे स्वामी विवेकानंदांनी 'कर्मयोगी' या आपल्या प्रसिद्ध ग्रंथात म्हटले आहे. ते लिहितातः " नि:स्वार्थ बुद्धी आणि सत्कर्म यांच्यायोगे मोक्ष प्राप्त करण्याचे साधन म्हणजे कर्मयोग. नीती आणि धर्म यांच्या पायावर कर्मयोग उभा सतो. कर्मयोग्याचा कोणत्याही सिद्धांतावर विश्वास नसला तरी चालू शकते. तो नास्तिक असला तरीही बिघडत नाही." सहिष्णुता आणि सामंजस्य, शांतता आणि सदिच्छा यांचा अंगिकार केल्याने ब्रम्हज्ञान प्राप्त होते. मोक्षप्राप्तीचे अंतिम उद्दिष्ट गाठण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध असतात, हे ओळखले पाहिजे.
     अहिंसा, शांतता आणि अनाक्रमण ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये होती. पाच हजार वर्षांच्या आपल्या गतिमान इतिहासामध्ये भारताने अनेक विशाल आणि वैभवशाली साम्राज्ये उभारली; परंतु आपल्या सीमेबाहेरच्या कोनत्याही प्रदेशावर ऐनिकी आक्रमण केले नाही. सहिष्णुता अंगी बाणलेली असल्यामुळेच आपण भारतीय लोक दु:ख आणि अन्याय निमुटपणे सहन करतो. एवढे अन्याय दुसर्‍या कोणत्या देशात घडून आले असते तर तेथे रक्तरंजित राज्यक्रांतीचे तांड्व उफाळून आले असते.
     सध्याचा काळ अध्यात्मिक निरक्षरतेचा आहे. पैसा मिळवता येतो; परंतु त्यामुळे सुखप्राप्ती होतेच असे नाही, याचा लोक अनुभव घेत आहेत. जीवनातील काव्याचा नाश करून ते स्वतःच स्वतः ला फसवीत आहेत. अशा वेळी खरा विकास मानवाच्या चैतन्याशी निगडित असतो, हे आपण ओळखले पाहिजे. ऐहिक प्रगती म्हणजे आत्मिक प्रगती नव्हे. जेव्हा तंत्रविज्ञान नैतिक विकासाला मारक ठरते तेव्हा विनाश घडून येणे अपरिहार्य होते. आत्म्यांचे प्रमाणिकरण करण्याच्या आणि कळपामध्ये मुक्ती शोधण्याच्या आजच्या काळात आपला प्राचीन वारसाच तारक ठरू शकेल.
     अनेक शतके मागे पडली; परंतु त्या वारशाचे तेज किंचितही उणावले नाही. उन्मत आक्रमकांनी या भूमीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले; परंतु येथील संस्कृती अभेद्यच राहिली.
      सी. राजगोपालाचारी यांनी म्हटले आहे," भारतात आजही थोडासा प्रामाणिकपना, आदरातिथ्य, पावित्र्य, बंधुभाव, भूतदया, पापपुण्यविवेक शिल्लक राहिला असेल तर त्याचे श्रेय आपल्या प्राचीन संस्कृतीलाच द्यावे लागेल."
     राजाजींनी ज्या प्राचीन संस्कृतीचा उल्लेख केला ती केवळ हिंदूपुरती, किंवा भारतीयांपुरती मर्यादित नसून विश्वव्यापी आहे. मानवजातीचे अत्यंत प्रगल्भ पांडित्य उपनिषदांमध्ये सामावलेले आहे, असे राजाजी म्हणत. हे पांडित्य, हा संदेश केवळ भारताच्या पुनर्निर्माणासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या पुनर्प्रशिक्षणासाठी अत्यंत उपकारक ठरू शकेल.
         ..                                                                                     -          नानी पालखीवाला
                                                                                   पुस्तक- वुइ, दि नेशन ( वाया गेलेली वर्षे)

शिक्षण व्यवस्थेची श्‍वेतपत्रिका


महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत राज्याने शिक्षणामध्ये केलेली प्रगती., शिक्षणाची आजची स्थिती, त्यातील नवी आव्हाने, गुणात्मक विकास, गाठावयाचा पल्ला, शाळाबाह्य मुले या सर्वांचे वास्तव चित्र समोर यावे, म्हणून राज्याच्या शिक्षण व्यवस्थेची श्‍वेतपत्रिका काढण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी विधान परिषदेत केली. येत्या हिवाळी अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत ही पत्रिका जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधान परिषदेत चर्चा उपस्थित केली होती. तब्बल तीन तासांहून अधिक काळ ही चर्चा झाली. त्याला दर्डा यांनी आज सविस्तर उत्तर दिले. शासनाची शिक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करीत अनेक महत्त्वाचे नवे निर्णयही त्यांनी जाहीर केले. (lokmat)

Friday, 30 March 2012

अध्यापकांची सेवानिवृत्तीची वयोर्मयादा 60 वरून 62 वर्षे

फेब््ररुवारीमध्ये निवृत्त झालेले पुन्हा सेवेत घेणार

प्रतिनिधी 2 जळगाव

अकृषी विद्यापीठे व अनुदानित महाविद्यालये तसेच तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नियंत्रणाखालील पात्र अध्यापकांची सेवानिवृत्तीची वयोर्मयादा 60 वरून 62 वर्षे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय 62 करण्याबाबत अनुदान आयोग व केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यापूर्वीच राज्य शासनाला कळविले होते. त्यामुळे उपरोक्त निर्णय शासनाने घेतला आहे.

या निर्णयाने येत्या मे, जून 2012 मध्ये सेवानिवृत्त होणार्‍या अध्यापकांची लॉटरी तर लागलीच पण त्याचबरोबर फेबुवारी 2011 मध्ये किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या अध्यापकांना पुन्हा सेवेत घेतले जाणार आहे.

राज्य शासनाचे कार्यासन अधिकारी विकास कदम यांच्या सहीने आलेल्या शासन निर्णयात नमूद केले आहे की, शासनाद्वारे सेवानिवृत्ती वयोर्मयादेत वाढ करण्याबाबत जी मार्गदर्शक तत्वे, आदेश वेळोवेळी निश्चित करण्यात येतील, ते सर्व या पदास जसेच्या तसे लागू राहतील. या शासन निर्णयातील तरतुदी फेब्रुवारी 2011 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहतील. त्यामुळे फेब्रुवारी 2011 पासून निवृत्त झालेल्या संचालक, उपसंचालक व सहायक संचालक, शारीरिक शिक्षण यांचे प्रस्ताव संबंधित संस्थेने विद्यापीठाकडे त्वरित पाठविणे गरजेचे आहे. यासंदर्भात आढावा समितीने 5 मार्च 2011, 23 नोव्हेंबर 2011 तसेच 23 फेब्रुवारी 2012 च्या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे प्रस्तावांची छाननी करून शिफारशींसह आवश्यक ते प्रस्ताव संचालक, उच्चशिक्षण विभाग, पुणे यांच्यामार्फत सादर करावेत. सेवानिवृत्त झालेल्या अध्यापकांना मुदतवाढ देताना त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिनांक व त्या दरम्यानचा कालावधी प्रत्यक्ष कर्तव्य कालावधी असणार नाही. त्यामुळे सदर कालावधीतील कोणतेही वेतन त्यांना मिळणार नाही, असे स्पष्ट करून निर्णयात पुढे नमूद केले आहे की, हा कालावधी सेवाखंड न धरता सेवानिवृत्ती वेतनाच्या प्रयोजनार्थ वेतनार्ह सेवा ग्राह्य धरण्यात येईल.  divya marathi

विनाअनुदान शाळांचे मूल्यांकन

मुचंडी/ वार्ताहरः - शासनाचे अनुदान नसल्याने अतिशय कठीण परिस्थितीत शाळा चालविणाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. या शाळांवर मागील दहा वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांची प्रतीक्षादेखील आता संपणार आहे. कारण शासनाने अनुदानसूत्र निश्‍चित करण्याचे तसेच मूल्यांकनाचे वेळापत्रकच जारी केले आहे.

इंग्रजी माध्यमवगळता राज्यातील कायम विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मूल्यांकन संबंधित शाळांना करावे लागणार असून, त्यांनी www.mahdoesecondary.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. मूल्यांकनाचे वेळापत्रक जारी झाले असून, अनुदानासाठी इच्छुक शाळेने निर्धारित निकषानुसार स्वतःचे मूल्यमापन करून संकेतस्थळावर माहिती सादर करावी, असे शासनाच्या आदेशात नमूद आहे. नऊ ते 23 एप्रिलदरम्यान ऑनलाइनपद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 24 एप्रिल ते आठ मेदरम्यान मूल्यांकन समिती प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी करणार आहे. तपासणी समिती आपल्या विभागातील मूल्यांकनानंतर अनुदानासाठी पात्र शाळांची यादी शासनाकडे सादर करेल. त्याची मुदत 14 मे आहे.

खातेनिहाय चौकशीचे आदेश

धर्माबाद। दि.0 (वार्ताहर)तालुक्यातील जि..शाळेतील सहशिक्षिका आपल्या जागेवर दुसर्या खाजगी व्यक्तीला शिकविण्यासाठी ठेवून पगार उचलत असल्याचे निदर्शनास आल्याने तिला निलंबित करण्यात आले. मात्र ही माहिती वरिष्ठांपासून लपविल्याबद्दल संबंधित केंद्रप्रमुखासह चार जणांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत.धर्माबाद तालुक्यातील सिरसखोड जि..शाळेतील सहशिक्षिका रत्नप्रभा संतोष बच्चुवार यांनी जुलै 0११ पासून आपल्या पदावर मानधन तत्त्वावर सुशिक्षित बेरोजगार व्यक्तीस शिकवणीस ठेवले होते. सदर प्रकरण उघडकीस आल्याने दोषी असलेल्या सहशिक्षिकेला १६ डिसेंबर ११ रोजी निलंबित करण्यात आले होते. याची माहिती असूनही ती वरिष्ठांपासून लपवून ठेवल्याच्या कारणावरून केंद्रप्रमुखासह चार जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यात केंद्रप्रमुख जी.जी. कवडे, केंद्रीय मुख्याध्यापक पी.टी.लखमावाड, माजी मुख्याध्यापक सविता व्यंकटराव आनलदास निलंबित सहशिक्षिका रत्नप्रभा बच्चुवार दोषी आढळून आले. निलंबित सहशिक्षिकेसंदर्भात पटपडताळणी पथकात केंद्रप्रमुख प्रभाकर कमटलवार यांचा पंचनामा खाजगी व्यक्ती विजय बिंदले यांनी खुलासा दिला. याप्रकरणी कारवाईची मागणी मनसेने केली आहे.साभार- दै. लोकमत

Thursday, 29 March 2012

नियामक संस्थांमध्ये भ्रष्टाचार

देशातील शिक्षणाची दिशा ठरवणार्‍या सर्वच नियामक संस्था भ्रष्टाचाराने पोखरल्या असून, या संस्थांमधील घोटाळ्यांमुळे सरकार हैराण झाले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनसह (एनसीटीई) आपल्या अनेक नियामक संस्थांमध्ये भ्रष्टाचार बळावत चालल्याचे एका गोपनीय अहवालात नमूद केले आहे.

विशेष म्हणजे रिझल्ट फ्रेमवर्क डॉक्युमेंटमध्ये सरकारने सर्व खात्यांना आपल्या अधीनस्थ विभागांपैकी भ्रष्टाचार होत असलेले विभाग नमूद करण्यास सांगितले आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कृती योजना तयार करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. यानुसार मंत्रालयाने भ्रष्टाचार वाढत चाललेल्या विभागांची नोंद घेतली आहे.

एआयसीटीईने व्हिजिलन्सच्या परिघात येणार्‍या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षेतखाली एक स्थायी समिती गठित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डीम्ड संस्थांना यूजीसीकडून मिळणार्‍या मान्यतेच्या प्रकरणातही घोटाळे होत असल्याची शक्यता मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

मान्यता देण्यात भ्रष्टाचार

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आपल्या खात्यांतर्गत कार्यवाहीदरम्यान तयार केलेल्या एका अहवालात एआयसीटीई आणि एनसीटीईच्या वतीने संस्थांना दिल्या जाणार्‍या मान्यता प्रक्रियेतही घोटाळे होत असल्याची शंका व्यक्त केली आहे. अनेक संस्थांना दिलेल्या मान्यतांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सीबीआयसह इतर तपास संस्था करीत असल्याचाही उल्लेख या गोपनीय अहवालात करण्यात आला आहे.

खरेदी, नियुक्तीतही घोटाळे

मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या या अहवालात म्हटले आहे की, संशोधन संस्था, विद्यापीठे व इतर शिक्षण संस्थांमध्ये विविध साहित्य खरेदीत घोटाळे होत असल्याच्या तक्रारी नेहमीच केल्या जातात. विविध पदांवरील नियुक्त्यांमध्येही भ्रष्टाचार होत असल्याची शक्यता मंत्रालयाने व्यक्त केली असून या सर्व नियामक संस्थांमधील सर्व पदांवरील नियुक्त्यांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ( आभार- दिव्य मराठी)