Friday 7 September 2012

अध्यापन एक व्रत

शिक्षणतज्ज्ञ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत. मुलांमध्ये शिक्षणाचीच नव्हे विविध व्यवहारांचीही गोडी वाढावी यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या, शिवाय  बॅडिमटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि गिर्यारोहणादी छंद जोपासणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाविषयी, ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनानिमित्त..
‘‘अध्यापन हे शास्त्र आहे आणि कसं शिकवायचं हे जेव्हा तुम्ही शिकता तेव्हाच तुम्हाला योग्य पद्धतीने मुलांना शिकवता येतं.’’ शिक्षणतज्ज्ञ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत त्यांच्या या क्षेत्रातल्या इतक्या वर्षांच्या अनुभवाअंती सांगतात.
सर्वसाधारणपणे ‘हाडाचा शिक्षक’ किंवा ‘शिक्षक हा जन्मावा लागतो..’ असं म्हटलं जातं, पण त्याचबरोबर शिक्षक घडणंही तितकंच महत्त्वाचं असतं. त्या स्वत: शिक्षक म्हणून कशा घडल्या हे सांगताना त्या म्हणतात, ‘‘मी हाडाची शिक्षक आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, कारण मला कधीच शिक्षक व्हायचं नव्हतं. मी अगदी योगायोगाने या क्षेत्रात आले, पण नंतर मात्र इथंच रमले. अनेकदा आपली भावंडे, आई-वडील किंवा एखादा सहाध्यायी यांनी शिकवलेलं आपल्याला चटकन समजतं. पण जेव्हा एका समुदायाला शिकवायचं असतं तेव्हा ते तंत्र माहिती करून घेणं खूप गरजेचं असे. मी स्वत:ला एक चांगली शिक्षक समजत असे.  मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिकवत असताना एकदा माझ्या वर्गातली काही मुलं चक्क डुलक्या काढताना बघितली तेव्हा सुरुवातीला तो मला माझा अपमान वाटला होता. पण मी जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की, हा ना माझ्या शिकवण्याचा दोष आहे, ना त्या मुलांचा. हा दोष परिस्थितीचा आहे.’’
आपल्यासमोरच्या मुलांना समजून घेऊन शिकवणं खूप गरजेचं आहे, असे सांगतांना त्या म्हणाल्या, ‘‘आपल्यासमोरची मुलं कोणत्या सामाजिक परिस्थितीतली आहेत हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पालिकेच्या शाळेत शिकणारी कठीण आíथक परिस्थितीला तोंड देणारी ती मुलं पहाटे कधी तरी उठून घरोघरी पेपर किंवा दुधाचा रतीब घालून शाळेत आलेली असतात. झोपणं ही त्यांची शारीरिक गरज असते. तेव्हा त्यांना झोप येणं हे स्वाभाविक आहे. त्यांना जागं ठेवणं हे माझं काम होतं. त्या दृष्टीने मी आमच्या शाळेत उपक्रम सुरू केले. पालिकेच्या शाळेच्या वाचनालयात भरपूर पुस्तके असतात. ती पुस्तकं एका पेटीत भरून वर्गात नेत असे. मुलांनी त्यांना आवडतील ती पुस्तकं घ्यावीत, घरी वाचावीत, वर्गणी काढून मुले बाजारातून ‘ठकठक’, ‘चांदोबा’सारखी पुस्तकं दर आठवडय़ाला विकत आणीत व सर्व  वर्ग आनंदाने वाचनात सहभागी होई.
त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहारातलं शिक्षण मिळावं याकरताही प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना सारस्वत बँकेत खातं उघडून दिलं. त्या वेळी मी नवीन खातं उघडण्यासाठी लागणाऱ्या तब्बल साडेचारशे फॉर्मवर सह्या केल्या होत्या! या खात्याचं त्या मुलांच्या पालकांनाही अप्रूप वाटलं होतं. कारण त्यातल्या अनेकांचं बँकेत कधी खातं नव्हतं. त्याचप्रमाणे मी मुलांना मुंबईतली विविध ठिकाणं दाखवायला नेत असे. या सगळ्यातून साध्य काय झालं, विचाराल तर मुलांना शिक्षणाची, शाळेची गोडी लागली. स्वतबद्दलचा आत्मविश्नास वाढला. सहकार्याने वागण्याची प्रवृत्ती वाढीला लागली.’’
पदवी मिळेपर्यंत कधी शिक्षक होण्याचा विचारही न केलेल्या डॉ. वसुधा कामतांचा आजचा एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू होण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला? सांगताना त्या म्हणतात, ‘‘माझे आई-वडील दोघेही डॉक्टर. त्यामुळे माझीही डॉक्टर होण्याची इच्छा होती. वडील सरकारी नोकरीत असल्याने त्यांच्या नेहमी बदल्या होत असत. ते मुद्दाम लहान गाव मागून घेत. आई मात्र त्या काळात डॉक्टर असूनही आमच्यासाठी घरी राहिली होती. त्यामुळे रायगडमधल्या आपटा, चौक, नांदगाव यांसारख्या छोटय़ा छोटय़ा गावांत आम्ही राहिलो. कधीतरी तर गावात माध्यमिक शाळादेखील नसे. जवळपासच्या शहरात जाऊन आम्ही आमचं शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढे कॉलेज शिक्षणासाठी मात्र हॉस्टेलवर राहावं लागलं.’’
मेडिकल नाहीतरी बी.एस्सी. झाल्यावर एखादा पॅरामेडिकल कोर्स न करता बी.एड्. होण्याचा निर्णय कसा घेतला?
 ‘‘पदवी मिळाल्यावर मी काहीच करण्याचं ठरवलं नव्हतं. मी जेमतेम १९ वर्षांची असतानाच ग्रॅज्युएट झाले. चार र्वष होस्टेलवर राहून इतकी कंटाळले होते की मला घरी राहायचं होतं. त्या वेळी बाबांनी नोकरी सोडली होती आणि ते गोरेगावला.. रायगड जिल्ह्यातलं माणगावजवळचं गाव.. स्थायिक झाले होते. तिथं राहून तसं फारसं काही करण्यासारखं नव्हतं. पण माझ्या नशिबात शिक्षक होण्याचं असावं. म्हणूनच तर मला तिथं शाळेत शिकवण्यासाठी बोलावलं. गणित, सायन्स शिकवायला नेहमीच शिक्षक लागत असतातच. त्यामुळे माझ्यापुढे शाळेत शिकवायला जाण्यावाचून काही पर्याय राहिलाच नाही!’’ 
म्हणजे वयाच्या विसाव्या वर्षीच तुम्ही शिक्षिका होणार हे ठरलं होतं तर?
  ‘‘नाही. तेव्हाही मी शिक्षिका व्हायचं ठरवलं नव्हतंच. त्या वेळी नुसतंच घरी बसून काय करायचं, म्हणून त्या शाळेत जाऊ लागले. तिथं नेहमी माझ्याबरोबर वावरणारी गावातली मुलंच माझे विद्यार्थी होते. त्या वेळी खरं तर ही मुलं वर्गात मला बाई म्हणतील का? माझं ऐकतील का? ही धास्ती होती. पण तसं काही घडलं नाही! उलट त्यातली काही मुलं इतकी हुशार होती, की त्यांना शिकवताना आव्हानात्मक वाटायचं. घरात सामाजिक बांधीलकीचं वातावरण होतं. बाबा सरकारी नोकरीत असल्यापासूनच आमच्याकडे जे पेशंट यायचे त्यांचं, औषधपाणी, खाणंपिणंच नाही तर वेळेला घरातून कपडेसुद्धा दिले जात असत. लहानपणापासून हे संस्कार झाल्याने मीही घरी बोलावून मुलांना शिकवत असे.’’
शिक्षकच व्हायचं हा निर्णय कसा घेतला? यावर त्या म्हणाल्या, ‘‘याला कारणीभूत ठरले मला गुरूसमान असणारे माझे मामा., डॉ.शरद्चंद्र कुळकर्णी. पुढे काय करायचं हा विचार करताना इतर चार मत्रिणी जशा बँकेत काम करू लागल्या तसं आपणही करावं असं वाटू लागलं. तेव्हा मामांनी मला बँकेत काम करण्यापेक्षा शिक्षक होण्याचा सल्ला दिला. विद्यार्थ्यांना शिकवणं हे जिवंत आव्हान पेलवण्यासारखं असून यासारखा दुसरा आनंद नाही हे त्यांनीच सांगितलं मला. म्हणून मी मुंबईत बी.एड्.ला अ‍ॅडमिशन घेतली. मग पुढे एम.एड्. केलं. मुंबई विद्यापीठाचे एम.एड चे अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडून प्रथम क्रमांक पटकावला. विद्यापीठाच्या शिक्षण विभागप्रमुख डॉ. प्रतिभा देव यांच्यासारख्या थोर गणितज्ज्ञाकडे पी.एच.डी.साठी संशोधन करण्याची संधी मिळाली. एसएनडीटी महिला विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात एम.ए.ही केलं. या विद्यापीठातून मास्टर्स केलेली मी इथली पहिली कुलगुरू आहे.’’
‘‘पीएच.डी.साठी माझा विषय होता स्वकल्पना अर्थात ‘सेल्फ कॉन्सेप्ट’. स्वत:ला स्वत:बद्दल काय वाटतं? आपल्याबद्दल दुसऱ्याला काय वाटतं, याबद्दल आपल्याला काय वाटतं? या सगळ्यातूनच आपण घडतो, आपण आपल्याविषयी विचार करतो. एका अर्थाने हा ‘शैक्षणिक मानसशास्त्राचा विषय होता. या संशोधनातून दिसून आलं की स्वसंकल्पना आणि शैक्षणिक संपादन या दोन गोष्टी परस्पर संबंधित आहेत. एकीत वाढ झाली तर दुसरीतही होऊ शकेल. मग विचार आला की शैक्षणिक संपादन वाढवले तर विद्यार्थ्यांची स्व-संकल्पना वाढेल का?’
‘‘यासाठी मी पाल्र्याच्या शिरूर मधील मुलांवर प्रयोग केला. त्यांना जेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्याविषयी लिहायला सांगितलं तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘मी अनाथ आहे!’ यातूनच त्यांचा स्वत:बद्दल असणारा दृष्टिकोन दिसतो. याचाच परिणाम त्यांच्या उत्कर्षांवर होतो. त्यांच्यात शिक्षणाबद्दलची त्यांच्यात गोडी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. त्यांची शैक्षणिक प्रगती १५-१६ महिन्यात दिसून आली त्याचबरोबर त्यांच्या स्वसंकल्पनेतही वाढ झाली होती. त्यांना आता स्वतबद्दल खूप चांगली, आश्वासक भावना निर्माण झाली होती. एकदा मी ट्रेनमधून कोकणातून मुंबईला परतत असताना माझ्यासमोर एक गृहस्थ येऊन बसले. त्यांनी त्यांची शिरूरमधली ओळख सांगितली. हा मुलगा इंजिनीयर होऊन राजधानी ट्रेनमध्ये एस्कॉर्ट म्हणून नोकरीला लागला होता. अशी मुलं भेटली की खरंच आपल्या कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.’’
त्यांच्या या प्रॉजेक्टला एन.सी.ई.आर.टी.तर्फे पुरस्कारही मिळाला होता, हे सांगताना आजही त्यांच्या चेहऱ्यावर तितकाच आनंद दिसतो. शिक्षण क्षेत्रातल्या त्यांच्या बहुआयामी कामानंतर आता त्या एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. इथंही त्यांनी विविध उपक्रम राबविले आहेत.
एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे ‘झीरो लेक्चर प्रोजेक्ट’. वर्गात शिक्षकांनी तासभर भाषण द्यायचे नाही. त्यांना भाषणातून जे काही सांगायचे आहे ते लिहून काढावे किंवा ऑडिओ/ व्हिडीओ रेकॉर्डिग करावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑनलाइन ग्रुपवर उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थिनी आपल्या सोयीनुसार ते अभ्यासून येतात. वर्गात मात्र गटांमध्ये माहिती संकलन, विषयानुरूप चर्चा, प्रेझेंटेशन इ. गोष्टींना खूप वेळ दिला जातो.
या प्रेझेंटेशनच्या वेळी इतर विद्यार्थिनी आणि शिक्षक उपस्थित राहून त्यावर फीडबॅक (प्रत्याभरण) देतात, आपल्याकडील अधिक माहिती देतात, शिक्षकांचे पुढील अभ्यासासाठी मार्गदर्शन मिळते. या सर्व कृतीमुळे सहकार्यातून, सहयोगातून शिकण्याचा दृष्टिकोन मिळतो. गटाचा पाठिंबा (सपोर्ट) असल्यामुळे हळूहळू आत्मविश्वास वाढतो. स्वत: नवीन विषयांचे अध्ययन करू शकतो हाही विश्वास निर्माण होतो.
आज या पद्धतीला फ्लिप्ड क्लासरूम असे नाव मिळाले आहे; परंतु आम्ही १२-१५ वर्षांपूर्वी हा विचार अमलात आणला. आम्ही या पदव्युत्तर अभ्यासक्रमात इंटर्नशिपचा समावेश केला. शेवटच्या चौथ्या सत्रात विविध संस्थांमध्ये, ई-लर्निग इंडस्ट्रीजमध्ये मुली इंटर्नशिप करतात, प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतात, परदेशी संस्थांबरोबर भारतात राहून काम करतात. इंटर्नशिपसाठी विद्यार्थिनी मुंबईतच नव्हे, तर भारतातील इतर मोठय़ा शहरांत जातात, तसेच भारताबाहेरील देशांमध्येही जातात. अशा आत्मविश्वासाने काम करणाऱ्या, उद्याला सामोऱ्या जाणाऱ्या मुलींना पाहून कार्यसफलतेचा अनुभव मिळतो.’’
शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांनी स्वत:च्या आवडी, छंदही कायम जपले आहेत. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘आम्हा भावंडांना लहानपणापासून वाचनाची सवय आहे आणि आवडही. मला गिर्यारोहणाचा छंद होता.. आता होताच म्हणावं लागेल! पुरंदरे बाबांबरोबर, गो. नि. दांडेकरांबरोबर मी खूप गड फिरले आहे. आम्ही गोरेगावला राहत असताना तिथून रायगड जवळ होता. आमच्याकडे कोणी आलं की त्यांना फिरायला घेऊन जायचं ते रायगडावरच. त्यातूनच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. मग ते वेडच लागलं. आप्पांनी जेव्हा रायगडावर ३००वा राज्याभिषेकाचा सोहळा साजरा केला तेव्हा त्यांनी ३०० वेगवेगळ्या गडांवरचं पाणी आणवलं होतं. त्या वेळी माझ्याकडे लोहगडाची जबाबदारी दिली होती. तेव्हा पहिल्यांदा मी माझ्याबरोबर इतर काही जणांना घेऊन लोहगडावर गेले. त्यानंतर अनेकांना घेऊन अनेक गड चढले. बॅडिमटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस यांसारखे खेळ खेळत असे. अजूनही संधी मिळाली तर मला टेबल टेनिससारखा कोणता तरी खेळ सुरू करायला आवडेल.’’
शिक्षणापासून छंदापर्यंत आपलं वेगळंपण जपणाऱ्या डॉ. वसुधा कामत यांनी स्वत:ला शिक्षक म्हणून घडवलं आहे, कधी प्रयत्नपूर्वक, तर कधी नकळत. ‘शिक्षकाचं काम विद्यार्थ्यांना शिकण्यास सर्वतोपरी मदत करण्याचे, त्यासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री गोळा करण्याचे, चांगले वातावरण निर्माण करण्याचे. शिकण्याची जबाबदारी मात्र शिकणाऱ्यावरच ’ हे त्यांच तत्त्व जर शिक्षकांनी आचरणात आणलं तर मुलं फक्त पदवीचा कागद हातात घेऊन व्यवहारी जगात पाऊल टाकणार नाहीत तर त्यांची जगातल्या व्यवहाराशी आधीच ओळख झालेली असेल!  (loksatta)

No comments:

Post a Comment