Saturday 19 January 2013

माणूस घडविणारी कार्यशाळा

ब्रिटिश कौन्सिलने उपक्रमशील शाळा म्हणून गौरविलेली नांदेडची राजर्षी शाहू विद्यालय ही जिल्ह्य़ातील एक प्रयोगशील शाळा म्हणून ओळखली जाते. कल्पकता, उपक्रमशीलता आणि प्रयोगशीलतेच्या बळावर शाळेने शिक्षणप्रक्रिया गतिमान केली आहे. २००० विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सर्वेक्षण प्रपत्र भरून घेऊन सावंत यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची जणू 'शैक्षणिक कुंडली'च तयार केली आहे.
शाळेत शैक्षणिकदृष्टय़ा अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मागासलेपणाच्या कारणांचा शोध घेऊन स्वतंत्र अशा अध्यापनाची नि:शुल्क सोय उपलब्ध करून दिली. शाळेत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वासंतिकवर्ग घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेविषयीचा भयगंड नाहीसा झाला. विद्यार्थ्यांच्या गळतीलाही आळा बसला असून दहावी आणि बारावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा शाळेने निर्माण केली आहे. बहुजन समाजातील शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गातील पालक शाळेविषयी नितांत समाधानी आहेत.
शाळेने 'शिस्त' आणि 'गुणवत्ता' हा मंत्र जिवापाड जपला. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत खास मार्गदर्शन वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना तयार करण्यात येते. जागतिकीकरणाच्या वावटळीत आपला विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी शाळेत इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत.
शाळेचा क्रीडा विभाग अतिशय समृद्ध असून शाळेच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांतील बक्षिसे अक्षरश: खेचून आणली आहेत. 'एक विषय : एक हस्तलिखित' हे राजर्षी शाहू विद्यालयाचे एक व्यवच्छेदक वैशिष्टय़ म्हणावे लागेल. सामान्यत: इतर शाळा वर्षांतून एक हस्तलिखित सिद्ध करतात. परंतु राजर्षी शाहू विद्यालयात एका वेळी एक विषय घेऊन त्यावर विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक स्वतंत्र हस्तलिखित आकारास येत असते. वर्षभरातून अशी किमान दहा हस्तलिखिते तयार होतात. या हस्तलिखितांना आता चिमुकल्या ज्ञानकोशांचे रूप येत आहे.
'प्रकल्पकार्य' हा आता अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग बनला असून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला आणि संशोधनाला प्रवृत्त करणे हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. या प्रकल्पांचे 'सृजन' या नावाचे प्रदर्शन भरविले जाते.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती वाढीस लागावी, यासाठी 'वर्गवार वाचनपेटय़ा' तयार केल्या आहेत. विद्यार्थी अशी वाचनपेटी वर्गात नेऊन पुस्तकांचे आवडीने वाचन करतात. 'मला आवडलेले पुस्तक' या विषयावर निबंध लिहितात, भाषण करतात.
विद्यालयात महिला स्वयंसिद्धा स्वसंरक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींना शारीरिक कवायतींबरोबरच समाजातील कर्तबगार महिलांचा परिचय करून दिला जातो. जीवनातील प्रत्येक संकटाला धीटपणे सामोरे जाण्याचे बाळकडू शालेय जीवनातच मुलींना दिले जात आहे.
पाठय़पुस्तकातील लेखक-कवी पाहायला मिळणे, त्यांच्या तोंडून त्यांच्या कवितेबद्दल, कथेबद्दल ऐकायला मिळणे हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आयुष्यातील एक अविस्मरणीय ठेवा असतो.
ते कुतूहल शमविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना त्यांचा आनंद मिळवून देण्यासाठी शाळेत 'लेखक आपल्या भेटीला' हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत त्यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या यदुनाथ थत्ते, फ. मुं. शिंदे, भास्कर चंदनशिव, लक्ष्मीकांत तांबोळी इत्यादी लेखक-कवींशी भेटी घडवून आणल्या आहेत.
'दैनंदिन जीवनातील विज्ञान' समजावून सांगण्यासाठी परिसरातील विज्ञान विषयाच्या जाणकारांना शाळेत बोलावून त्यांची सप्रयोग व्याख्याने आयोजित केली जातात. त्यामुळे विद्यार्थी अंधश्रद्ध किंवा भाबडा न बनता प्रत्येक घटनेमागील शास्त्रीय कार्यकारणभाव चिकित्सकपणे शोधू लागतो, हे या उपक्रमाचे फलित म्हणावे लागेल.
शाळेत नियमित योगशिबिरे घेतली जातात. अनेकदा विद्यार्थीच आपल्या बांधवांना योगाचे धडे देतात, ही घटनाच मोठी उत्साहवर्धक आहे.
विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात निवडावयाच्या अभ्यासक्रमाची तोंडओळख व्हावी यासाठी शाळेत दरवर्षी व्यवसाय मार्गदर्शन परिषदा घेतल्या जातात. त्यातून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळवून दिले जाते. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आणि महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते.
सहलीला जाऊन आलेल्या विद्यार्थ्यांना निबंधलेखनासाठी प्रवृत्त केले जाते. विद्यार्थ्यांच्या निबंधांवर भाषिक व संपादकीय संस्कार करून 'मी अनुभवलेली सहल' हा विद्यार्थ्यांच्या निबंधांचा उत्कृष्ट असा शंभर पृष्ठांचा संग्रह प्रकाशित केला.
शाळेतील शालान्त परीक्षेचे केंद्र हे 'कॉपीमुक्त व आदर्श परीक्षा केंद्र' बनले आहे.
विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून पोस्टामध्ये बचत खाती उघडण्यासाठी प्रवृत्त केले असून आतापर्यंत विद्यार्थ्यांनी पाच लक्ष रुपयांची रक्कम बचत खात्यात गुंतविली आहे. मुख्याध्यापकांसह शिक्षक व विद्यार्थ्यांनी आपली शाळा ही 'बचत शाळा' करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सामाजिक वनीकरण खात्याच्या माध्यमातून राजर्षी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गतवर्षी वृक्षदिंडी काढून वनमहोत्सव साजरा केला आणि शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले.
'ज्ञानपोई' हा असाच एक अभिनव उपक्रम. प्रत्येक शिक्षकाने दरमहा एक पुस्तक विकत घ्यायचे आणि ते वाचल्यानंतर शाळेच्या वाचनालयाला भेट द्यायचे, असा हा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांकडून दरवर्षी शाळेला पाचशे पुस्तके भेट मिळत आहेत आणि शालेय ग्रंथालय समृद्ध होत आहे.
राजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थी मतदानाच्या माध्यमातून दरवर्षी आपला 'आदर्श शिक्षक' निवडतात; तर शिक्षक आपला 'चांगला सहकारी' निवडतात. 'शोध एकलव्याचा' या उपक्रमांतर्गत दरवर्षी आदर्श विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि स्नेहसंमेलनाच्या समारोप समारंभात आदर्श विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव केला जातो.
आपल्या वाढदिवसानिमित्त जेव्हा मुख्याध्यापकांना अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी येतो, तेव्हा ते तोंडभरून आशीर्वाद तर देतातच; शिवाय एखादे चांगले पुस्तक भेट देऊन त्याला न संपणारी संस्कारांची शिदोरीही देतात.
शिक्षणाचा अर्थ केवळ पाठय़पुस्तके शिकविणे हा नव्हे, तर मानवी संसाधनाचा विकास साधणे हे शिक्षणाचे अंतिम ध्येय मानून या शाळेने आजपर्यंत अक्षरश: हजारो विद्यार्थी घडविले आहेत.
भारत सरकारच्या अनुदानातून शाळेत संगणक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली असून सुमारे २००० विद्यार्थी संगणक साक्षर बनले आहेत. इयत्ता पाचवी ते बारावीचा अभ्यासक्रम प्रोजेक्टरच्या माध्यमातून डिजिटल क्लास रूम विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची अध्ययनशीलता आणि आकलनक्षमता वृद्धिंगत होण्यास मदत झाली आहे. (loksatta)

No comments:

Post a Comment