Sunday 18 September 2011

नवीन शिक्षक भरती थांबवणार

नवीन शिक्षक भरती थांबवणार
-
कऱ्हाड - नांदेड जिल्ह्यातील शाळांतून बोगस पटसंख्येच्या प्रकरणानंतर शासनाने त्याचे राज्यभर सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर शासनाची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची बचत होईल. यामुळे अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांना अन्यत्र सामावून घेईपर्यंत नवीन शिक्षक भरती थांबवली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा आटोपून श्री. पवार काल रात्री येथे आले. मुंबईला जाण्यासाठी ते रेल्वे स्थानकावर आले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या दहा महिन्यांच्या कामांबाबत ते म्हणाले, 'शासनाने शिक्षक, ग्रामसेवक, कोतवालांच्या मानधनात वाढ केली आहे. संजय गांधी निराधार योजनेची रक्कम प्रत्येक महिन्याला देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी बायोमेट्रिक पद्धतही सुरू केली आहे. त्याचा प्रारंभ कोल्हापूर जिल्ह्यात झाला. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, बीड व ठाणे जिल्ह्यात, तर दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांत व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांत कार्यान्वित केली जाईल. या यंत्रणेमुळे लाभार्थीलाच फायदा होईल. वंचितांना लाभ देण्याचा प्रयत्न करताना पारदर्शकपणा आणून गरजूला त्याचा फायदा व्हावा, त्याच्या नावावर दुसऱ्याने फायदा घेऊ नये, यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात शाळांचे बोगस पटसंख्या प्रकरण बाहेर काढण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात त्याचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर शासनाने कमीत- कमी दोन हजार कोटी व जास्तीत- जास्त तीन हजार कोटी रुपयांची बचत होईल.''

ते म्हणाले, 'राज्यात दोन ऑक्‍टोबरपासून शासनाच्या जीवनदायी योजनेला प्रारंभ होत आहे. आठ जिल्ह्यांत त्यास सुरवात होईल. या योजनेतंर्गत कुटुंबाचा विमा उतरवून वर्षभरासाठी कमीत- कमी दीड लाख व किडनीरोपणासाठी अडीच लाख रुपये खर्च केला जाईल. एप्रिलपासून या योजनेसाठी सुमारे 900 कोटी रुपये खर्च येणार आहे.''

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सातारा जिल्हा दौरे वाढल्याबाबत ते म्हणाले, 'राष्ट्रवादीचे नेतेही जिल्ह्यात येत आहेत. विलासराव पाटील-उंडाळकर वगळता अन्य ठिकाणी आमच्या पक्षाचे आमदार आहेत. तेही फिरताहेत. मुख्यमंत्री या जिल्ह्यातील असल्यामुळे ते येणारच. उलट त्यामुळे लोकांचे भले होणार असेल तर काय वाईट आहे.''
निधीमुळे कामेजिल्हा नियोजन मंडळाला अधिक निधी दिला आहे. त्यामुळे निधी मिळाल्यावर कामे होत असतात. कोण कामे करतो, कोण नाही याचा लोक विचार नक्कीच करतात. आघाडी शासन असल्याने दोन्ही पक्ष आपापले पक्ष वाढवत आहेत, असे श्री. पवार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment